Monday, April 4, 2016

आवाज उन्माद

पहाटे चार - साडेचारची वेळ. एक मिरवणूक, ढोल ताश्यांच्या गजरासह. आसपासच्या जनतेच्या झोपेचं खोबरं!
दुपारी अडीच - तीन आणी रात्री बाराचा सुमार. गडगड धडधड करत, सर्कशीतल्या मृत्युगोलातल्या फटफटीसारखा आवाज करत, रोजच वृद्ध आणी बालकांना निद्रेतून दचकवण्याचा पराक्रम.
रात्रीची वेळ, सहा वाद्यवृंद,एकमेकांशी कोणताही मेळ नसलेले, एक पालखी, पंचवीस एक माणसं सोबत, गणवेशासारखे एकाच प्रकारचे नवे कोरे कपडे ल्यालेली. रस्ता अडवून तास दोन तास वहतूकीचा खोळंबा.
सजवलेले दहाबारा ट्रक, कर्णकर्कश्य शब्द नकळणारी कानठळ्या बसवणारी गाणी वाजवणारे कर्णे. पिसाळलेल्या मधमाश्यांसारखी एका फटफटीवर तीन चार बसून इकडून तिकडे, वाहतूकीचा विचार न करता वेगात उन्मादात फीरणारी तरुणाई. तीन चार तास वाहनांच्या मैलभर रांगा जागेवर उभ्या. प्रवास करण-याचे हाल. उघड काही बोलायची सोय नाही, सगळीच स्फोटक परीस्थीती.
पत्र्याच्या पिंपासारखे वाजणारे पाच-सहा ढोल- ताशे, छोट्या गल्ली बोळात डोक्यात कळा याव्यात असा कल्लोळ. मुंगीच्या पावलाने सरकणारी किंवा प्रसंगी एकाच जागी स्थीर तास दोन तास मिरवणूक. हेही कमी म्हणून कि काय, उंचावर टांगलेला रीकामा सिलींडर, त्यावर घणाने आघात करून आसमंत दणदणून टाकणारे आतापर्यंत बहूधा बहीरे झालेले व्यक्तीमत्व. इतरांनाही बहीरे करण्याचे महान कार्य करणारे. 
ध्वनीप्रदूषणाचे सर्व कायदे, नियम मोडून मध्यरात्रीच्या सुमारास, हवेत उडून मोठ्ठा आवाज करणारे फटाके लावायचे. कारण काहीही असो - नसो! एकदा वात पेटवली तर पन्नास बार.
असं म्हणतात की आदिकाळात, काळोखाच्या, अनाकलनीय दूष्ट शक्ती अथवा हिंस्त्र श्वापदांच्या भयाने, वेगेवेगळे मोठे आवाज करुन त्यांना पळवून लावले जायचं. आज नक्की कोणत्या भयगंडाने हा समाज आपल्याच समाजबांधवांना उपद्रव देतोय, सळो की पळो करुन सोडतोय?

No comments: