Friday, March 25, 2016



भारत माता कि जय

आमच्या शाळेत एक शिक्षक, नुस्त कोंबडा म्हणून ओरडलं की चिडायचे. मग सगळी धमाल असायची वर्गात. भडकलेले सर, हसणारी मुलं ह्यामध्ये मग अभ्यासाचा सगळाच खेळ-खंडोबा! आताही तसाच खेळ सुरू आहे. कुणी तरी काही तरी म्हणणार नाही म्हंटल्यावर नुस्ता गोधळ माजलाय. खोडी काढण-याला फुकटची भरपूर प्रसिद्धी. दुर्लक्ष केलं असतं तर तो कोण खुळा त्याचं नावच कुणाच्या लक्षात आलं नसतं. पण आपल्या उन्मादात केवढा मोठा केला त्याला.
घरोघरी पहायला गेलं तर कळतय कोण कसं वागवतय. म्हाता-या आई-बापांना! जिवंत असताना माहीत नाही, पण गेल्यावर दिवस करायचे साग्रसंगीत सग्यासोय-यांना जेवण वगैरे घालून, पद्धतशीर गळा काढून दूख: दाखवायचं. आजुबाजुला माता पित्यांना छळणारे असले तरी आपण गप्प रहातो. कशाला भानगडीत पडायचं? म्हणून दूर्लक्ष करतो. भारतमातेवर अत्याचार करणा-याच्या बाबतीतही आपण असच करतो. तोंडाने जय म्हणायचं आणी चारीबाजूने ओरबाडायचं. पाच पैशाचे पाचशे कोटी होतात, झोपड्यांवर दरवर्षी मजले चढतायत, लाखो ईमारती अशाच उभ्या रहाताहेत. उद्या त्या सगळ्या नियमित होतील. त्यातला अर्थ परत घर विकत घेउन त्यात रहाणा-याच्या खिशालाच चाट मारणार. त्या बांधून विकणारे, त्या कडे सोईस्कर दुर्लक्ष करणारी अधीकारी मंडळी सगळेच नामा निराळे. त्यांना कसलीच धस लागत नाही. मलावाटतं, ह्याचं कारण् हे सगळे भारत माताकी जय अगदी मोठ्याने म्हणत असावे.
कीतीही चांगले यश मिळवा, समाजात सत्कार्य करा, सचोटीने, वागा, कायदा कानून्, नियम पाळा, अनेकांचं भलं करा, पण प्रसिद्धी मिळेलच ह्याची खात्री नाही. पण कसलीही विटंबना करा, प्रसिद्धी शंभर टक्के. आणी काही समाजसुधारणेचे संदेश देणारे सिनेमे कसे हे करु नका, हे वाईट बर का, असं सांगताना काय वाईट तो सगळा मसाला मोकळेपणे दाखवतात, तसच आपल्यातले काही, ह्या वाईटाला दुर्लक्षून दडपून टाकायच्या ऎवजी त्याचाच प्रचार प्रसार करतात. अप्रत्यक्षपणे, समाजात विष पेरणा-याच्या मनातली ईच्छा पुरी करायला हातभार लावतात. त्याला विरोध करायच्या नावाने हैदोस घालणारे, जनमत भडकवून परत आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी, मातेच्या पराजयाचे आपले काम तसेच चालू ठेवतात.
एवढच वाटतं की, मातेचं नाव घेण्यापुर्वी, तिचा जयघोष करण्यासाठी आपणही हे पवित्र नाव घ्यायला लायक असावं, लायक बनावं. ह्या भारत मातेचं, भुमातेचं संवर्धन करायला सगळ्यांना उद्युक्त कराव. आपल्या देशाला सुजलाम सुफलाम होण्यासाठी एकदिलाने लढायला तयार व्हावं आणी अभीमानानं म्हणावं. " भारत माता की जय" एखादा नाही म्हणाला तर गेला खड्ड्यात!