Monday, April 25, 2016

दीन वसुंधरा दिन

        १० एप्रील, रविवारच्या लोकसत्तामध्ये दोन बातम्या. क्रिकेटच्या मैदानांवर, दुष्काळी परीस्थीतीत वापरलं जाणारं पाणी वाचवलं तर १०० कोटींचं राज्याचं उत्पन्न बुडेल. पण आज गरज आहे पाण्याची त्याचं काय?
दूसरी बातमी, शिवाजीपार्क मधील सभेत ५० डेसीबल्स पेक्षा अधीक तीव्रतेचा आवाज झाल्याने, कायदेशीर कारवाई होणार. मुंबईत अशी कोणती जागा आहे की तेथे ६०-६५ डेसीबल्स पेक्षा कमी आवाजाची नोंद होते? आपल्या घरातही ह्या पेक्षा कमी शांतता असते.
       राज्याच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं तर अब्जावधीची कमाई करणा-या अशा तमाश्यांतून मिळणा-या पैशावर अवलंबून असेल तर अनेक थिल्लर कार्यक्रम घडवून, पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण हक्क विकून पैसा उभा करता येईल. मग चंद्रपूर मध्ये बूडणा-या ६०० कोटींच्या महसूलाचे काय? दुष्काळी भागातील आधाशी पिकं, कारखाने, बाटलीबंद पाणी, पेयांचे व इतर कारखाने असो, मोठा आवाज करणा-या फटफट्यांचं वाढतं खूळ किंवा उगाचच वाहनांचे कर्णे वाजवायची सवय असो, शांतता विभागातील कायम मर्यादेपलीकडे असणारा गोंगाट असो, आपण ह्या बाबत फारसं गंभीर नाही आहोत. जागतीक पातळीवरही हेच चाललय. शहरं स्मार्ट करायच्या नादात, स्वास्थ्य बिघडवणा-या, मौसमांना, ॠतूचक्राला सैरभैर करणा-या समस्यांकडे डोळे झाक जिवघेणी ठरु शकते.
       पर्यावरण संरक्षण, संवर्धन हे आज विकासाच्या विरुद्ध अर्थी समजलं जातय. पर्यावरणातील बदल, प्रदूषणाचे दुष्परीणाम ह्या बद्दलचे अद्न्यान आणि खेदजनक दुर्लक्ष्य सगळ्याच राज्यांत व बहूतेक राष्ट्रांमध्येही सारखेच आहे. वसुंधरेचं वाढणारं तापंमान, वाढणारी समुद्राची पातळी, भवतालच्या हवा- पाण्यातील विषारी प्रदूषकांचं वाढतं प्रमाण ह्याच्या परीणामस्वरुप आपल्या पुढील तिस-या - चवथ्या पिढीला कसल्या भीषण वास्तव्याला तोड द्यावं लागणार आहे ह्याची झलक चहुकडे दिसतेच आहे. दुष्काळ, पूर, महा विध्वंसक वादळे, कॅंसर - हृदयविकारासारख्या रोगांचे वाढते प्रमाण, त्यातून वाढणारी ईस्पीतळं, औषधांची दुकाने आपल्याला दिसत नाहीत काय? की, आपल्या पणतवंडांच्या वा त्यांच्या मुला-नातवंडांच्या भवितव्याबद्दल आपण असेच बेफीकीर रहाणार आहोत? मग वाढत्या तापमानाने, वाढणा-या समुद्रपातळीमुळे, आपण आपल्या शहरासकट, स्मार्ट फोन घेऊन तीस फूट पाण्याखाली गेलो तरी बेहत्तर!

Sunday, April 10, 2016

उन्हाळा

   पेल्टोफोरमचे पिवळे धमक तुरे डोकं वर काढायला लागलेत. सकाळीच नाचरा फॅनटेल फ्लायकॅचर सुरेल गात, शेपटीचा पंखा उघडून नाचून गेला. जांभळा झगमगीत सनबर्ड उच्चरवाची शीळ घालत सारखाच लक्ष वेधून घेतोय. भारद्वाजाचं कुटूंब जडपणे झाडावरून कुंपणावर, तेथून जमीनीवर असा प्रवास, लाल डोळ्यांनी चहुकडे सावधपणे पहात करतोय. भांडखोर खारी शेपटी उडवत स्वैरपणे छपरावरुन झाडावर पकडापकडी खेळताहेत.
          कुठल्या संरक्षीत वनातल्या सहलीचे हे वर्णन नाहीय. शहरातल्या घराच्या खिडकीतून, गॅलरीतून दिसणारा हा देखावा आहे. कधी उन्हात फुलांतला मध टिपणारी फुलपाखरं दिसतात, मुंगुस कधी एकटा तर कधी मुलाबाळांसह झुबकेदार शेपटी फुलवत मान उंचावून माणकासारख्या डॊळ्यांनी  पहात झुडुपात दिसेनासे होतात. बुलबुल दिसला नाही दिसला तरी त्याच्या गोड शीळेने आपण आल्याची वर्दी देतो. उन्हाळा सुरु होतोय. बाहेर पडलात तर कुठे बहावा पिवळे लोंबते  घोस लेऊन सजलेला दिसेल. रखरखत्या रणरणत्या उन्हात गुल्मोहर कुठे पर्णहीन रक्तवर्णी फुलो-याचं सौदर्य दाखवतो तर कुठे गर्द हीरव्या पालवीची किनार ल्यालेली फुलभरलेली झाडं वेगळच रुप दाखवतात. सावरीच्या सुकलेल्या बोंडांतून निघणा-या तलम, पिसासारख्या म्हाता-या वा-यावर स्वैर विहार करताहेत
         आजुबाजुला पाहिलं तर निसर्ग वेगवेगळ्या रुपात आपलं मन रिझवायचा प्रयत्न करत असतो. ते पहायची दृष्टी आपल्या जवळ असेल तर आयुष्यात रोज नवा आनंदाचा अध्याय उलगडत रहातो.

Monday, April 4, 2016

आवाज उन्माद

पहाटे चार - साडेचारची वेळ. एक मिरवणूक, ढोल ताश्यांच्या गजरासह. आसपासच्या जनतेच्या झोपेचं खोबरं!
दुपारी अडीच - तीन आणी रात्री बाराचा सुमार. गडगड धडधड करत, सर्कशीतल्या मृत्युगोलातल्या फटफटीसारखा आवाज करत, रोजच वृद्ध आणी बालकांना निद्रेतून दचकवण्याचा पराक्रम.
रात्रीची वेळ, सहा वाद्यवृंद,एकमेकांशी कोणताही मेळ नसलेले, एक पालखी, पंचवीस एक माणसं सोबत, गणवेशासारखे एकाच प्रकारचे नवे कोरे कपडे ल्यालेली. रस्ता अडवून तास दोन तास वहतूकीचा खोळंबा.
सजवलेले दहाबारा ट्रक, कर्णकर्कश्य शब्द नकळणारी कानठळ्या बसवणारी गाणी वाजवणारे कर्णे. पिसाळलेल्या मधमाश्यांसारखी एका फटफटीवर तीन चार बसून इकडून तिकडे, वाहतूकीचा विचार न करता वेगात उन्मादात फीरणारी तरुणाई. तीन चार तास वाहनांच्या मैलभर रांगा जागेवर उभ्या. प्रवास करण-याचे हाल. उघड काही बोलायची सोय नाही, सगळीच स्फोटक परीस्थीती.
पत्र्याच्या पिंपासारखे वाजणारे पाच-सहा ढोल- ताशे, छोट्या गल्ली बोळात डोक्यात कळा याव्यात असा कल्लोळ. मुंगीच्या पावलाने सरकणारी किंवा प्रसंगी एकाच जागी स्थीर तास दोन तास मिरवणूक. हेही कमी म्हणून कि काय, उंचावर टांगलेला रीकामा सिलींडर, त्यावर घणाने आघात करून आसमंत दणदणून टाकणारे आतापर्यंत बहूधा बहीरे झालेले व्यक्तीमत्व. इतरांनाही बहीरे करण्याचे महान कार्य करणारे. 
ध्वनीप्रदूषणाचे सर्व कायदे, नियम मोडून मध्यरात्रीच्या सुमारास, हवेत उडून मोठ्ठा आवाज करणारे फटाके लावायचे. कारण काहीही असो - नसो! एकदा वात पेटवली तर पन्नास बार.
असं म्हणतात की आदिकाळात, काळोखाच्या, अनाकलनीय दूष्ट शक्ती अथवा हिंस्त्र श्वापदांच्या भयाने, वेगेवेगळे मोठे आवाज करुन त्यांना पळवून लावले जायचं. आज नक्की कोणत्या भयगंडाने हा समाज आपल्याच समाजबांधवांना उपद्रव देतोय, सळो की पळो करुन सोडतोय?